पुणे : सर्व सन्मानपूर्वक झालं तर युती शक्य होईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. सेनेशी चर्चेस पूर्णपणे तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


युतीचा निर्णय हा जिल्हा स्तरावर घेण्यात यावा, आम्ही शिवसेनेशी पूर्णपणे चर्चा करण्यास तयार आहोत, सर्व गोष्टी सन्मानपूर्वक झाल्या, तर युती शक्य होईल, असं दानवे यांनी स्पष्ट केलं. ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर बोलत होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.

स्थानिक पातळीवर भाजप प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत सर्वांनी व्यक्त केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषणात निर्णय जाहीर केला. आता कोणावर अवलंबून राहू नका, स्वबळावर लढण्याची तयारी करा, असा इशारा उद्धव यांनी दिला.