मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचं सरकार शेतकऱ्यांचं आहे, असं सांगतात मात्र त्यांचेच प्रदेशाध्यक्ष वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे या दोन्हीही नेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.

एबीपी माझाने आज सकाळी 10 ते 10.30 पर्यंत फोनवरुन प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

एकीकडे शेतकरी चहूबाजूंनी संकटात आहे, तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करु असं म्हटलं असूनही शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागतंय. हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाहीच, आम्हाला कर्जमाफी नको, तुरीला भाव नको, मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवेंचे राजीनामे हवेत, अशी प्रतिक्रिया संतप्त प्रेक्षकाने दिली.

प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या काही प्रतिक्रिया

  • दानवेंचं वक्तव्य म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी आहे. या सरकारकडून काहीही अपेक्षा राहिली नाही : गंगाधर धावडे, नांदेड


 

  • दानवेंच्या वक्तव्यातून सत्तेचा माज दिसतो. ज्या बळीराजाच्या जीवावर यांनी सत्ता स्थापन केली, त्यांच्याबद्दलच हे बेताल वक्तव्य करतात म्हणजे हा सत्तेचाच माज आहे. दानवेंनी शेतात 5-50 हजार पेरून, शेती करुन बघावी : सयाजी यादव, सातारा


 

  • रावसाहेब दानवें यांना सत्तेची मस्ती आहे. जालन्यात तूर पडून आहे आणि हे तुरीबाबत बोलत आहेत. त्यांची हकालपट्टी करायला हवी  : भागवत बोर्डे, जालना


 

  • दानवे हे शेतात जाऊन काम करणारे शेतकरी नाहीत, ते तोंडाने शेती करणारे शेतकरी आहेत , या सरकारला सत्तेचा माज आला आहे: दीपक पाटील, नाशिक


 

  • दानवेंनी 2-3 वेळा शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केलंय. खुर्ची म्हणजे स्वत:ची इस्टेट समजून हुकूमशाही सुरुय. आम्हाला कर्जमाफी नको, तुरीला भाव नको, रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा  : रामदास सहाने, इगतपुरी


(रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुमच्याही प्रतिक्रिया असतील, तर त्या बातमीखालील कमेंट बॉक्समध्ये सविस्तर लिहा)




रावसाहेब दानवे काय म्हणाले?

राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी रडगाणं चालूच आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ते काल जालन्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही, असली गाणी बंद करा, असं दानवे म्हणाले. एवढंच नाही तर यावेळी दानवेंनी शेतकऱ्यांसंदर्भात असंसदीय भाषेचा वापरही केला.

डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्य : अशोक चव्हाण

“इतकी तूर खरेदी करूनही शेतकऱ्यांचे रडगाणे सुरुच आहे. एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरी रडतात xxx.” असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून, सत्तेची नशा दानवेंच्या डोक्यात गेल्याने दानवे शेतकऱ्यांबाबत असंसदीय शब्द वापरून अशी बेताल वक्तव्ये करत आहेत. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत.” अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

दानवेंची मस्ती शेतकरीच जिरवतील : धनंजय मुंडे

“शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेंची जीभ झडायला पाहिजे. शेतकऱ्यांबद्दल द्वेषच यातून दिसून येतो. फक्त दानवे नव्हे, संपूर्ण सरकारमध्ये शेतकऱ्यांबद्दल असाच द्वेष आहे. यांना शेतकरी समूहच नष्ट करायचा आहे. शेतकऱ्यांबद्दल असे गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांची मस्ती शेतकरी जिरवल्याशिवाय राहणार नाहीत.”, असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दानवेंवर केला.

रावसाहेब दानवे बेजबाबदार : पृथ्वीराज चव्हाण

“असं बेजबाबदार वक्तव्य करणं ही काही रावसाहेब दानवेंची पहिली वेळ नाही. इतक्या महत्त्वाच्या पदावर असताना त्यांनी भान ठेवायला हवं. अर्थात ती भाजपची अंतर्गत गोष्ट आहे.”, अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

सत्तेतून आलेला माज दानवेंच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसतो : डॉ. राजू वाघमारे

“सत्तेचा आलेला उन्माद, माज हा रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसतो. असं बोलणं भाजपची परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाविषयी या सुटा-बुटातल्या सरकारला जराही प्रेम नाहीय.”, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली.

 संबंधित बातम्या

बेताल बरळणाऱ्या दानवेंवर विरोधकांची तोफ 

तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, दानवे पुन्हा बरळले! 

हजार-पाचशेच्या नोटा असतील तर द्या, मी बदलून देतो : दानवे 

कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील हे लेखी द्या : दानवे