बुलडाणा : हजार-पाचशेच्या नोटा असतील तर द्या, मी बदलून देतो, असं वक्तव्य करुन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपली धक्कादायक वक्तव्याची मालिका कायम राखली आहे. चिखली येथील जाहीर सभेत दानवेंनी हे वक्तव्य केलं. दानवे एवढ्यावरच थांबले नाहीत. "महाराष्ट्रात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम दुष्काळ असल्याचं ओरडून सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राला 4200 कोटींची मदत मिळाली.", असं दुसरं धक्कादायक वक्तव्य दानवेंनी याच सभेत केलं.


हजार-पाचशेच्या नोटा असतील तर द्या, मी बदलून देतो : दानवे

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केल्यानंतर सर्वाना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर द्या माझ्याकडे, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?", असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी चिखलीतील सभेत केलं.



"दुष्काळ नव्हता, तरी ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली"

"गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत मिळाली.", असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं.

VIDEO :