तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, दानवे पुन्हा बरळले!
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2017 06:03 PM (IST)
जालना : राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ते आज जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली आहेत. शिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्यानं दानवेंना तूर खरेदी बाबत लोकांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना दानवेंची जीभ घसरली. राज्य सरकारनं एक लाख टन तूर खरेदी केली तरी लोक रडतात XXX, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्याला झापलं. एवढंच नाही तर त्यांनी खालच्या पातळीवर टीकाही केली. रावसाहेब दानवेंच्या हस्ते पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. संवाद यात्रेच्या तोंडावर यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. त्यात बोलताना दानवे बरळले. दानवेंची वादग्रस्त वक्तव्य : हजार-पाचशेच्या नोटा असतील तर द्या, मी बदलून देतो : दानवे “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केल्यानंतर सर्वाना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर द्या माझ्याकडे, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी चिखलीतील सभेत केलं. “दुष्काळ नव्हता, तरी ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली” “गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत मिळाली.”, असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं होतं. ''... त्या लक्ष्मीचा स्वीकार करा'' पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील हे लेखी द्या : दानवे कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते आज शिर्डीत बोलत होते. बातमीचा व्हिडीओ :