नाशिक: राज्यासह देशभरात आज उत्साहात रामनवमी साजरी करण्यात येत आहे. उत्तरेतील अयोध्येपासून दक्षिणेच्या रामेश्वरमपर्यंत रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाला सुरूवात होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जवळजवळ आठवडाभर रामजन्मोत्सव साजरा केला जातो.


देशभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नाशिकमधील पंचवटीला अनेक भाविक यानिमित्तानं भेट देतात.

दंडकारण्याच्या भागात प्रभूरामचंद्रांनी तब्बल 14 हजार राक्षसांचा वध केल्याची आख्यायिका आहे. रावणाची बहिण शुर्पणखा हिचं नाक कापल्याची घटनाही याच भागात घडल्याचं म्हटलं जातं.

पंचवटीतल्या रामाच्या वास्तव्यामुळेच पुढच्या काळातही या भूमीला साधूसंतांची भूमी असं म्हटलं गेलं. एकीकडे सीता सरोवर आणि दुसऱ्या बाजूला असणारं प्रभू रामाचं मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा मार्गही गुहेसारखा आहे.

पेशव्यांनी 1790मध्ये पंचटवटी भागात काळाराम मंदिर बांधून त्यांच्या स्मृतींचं जतन करण्यासाठी हे धर्मक्षेत्र तयार केलं. रामनवमीच्या निमित्ताने पंचवटीचा परिसर पुन्हा भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेलेला पाहायला मिळतो आहे.