अकोला: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेनंतर आता आमदार बच्चू कडू ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीपासून ते आसूड यात्रा काढणार आहेत. ‘सीएम टू पीएम, देवेंद्र ते नरेंद्र’ अशी ही आसूड यात्रा काढणार आहेत.


'आतापर्यंत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जोडे मारो आंदोलन केलं. आता काही मंत्र्यांच्या विरोधात करावे लागेल, आधी लाल दिव्याच्या गाड्या काळ्या करणार.' असा इशारा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

'सत्ताकाळात स्वामीनाथन आयोग लागू केला असता तर आज संघर्षयात्रा काढावी लागली नसती.' अशा शब्दात बच्चू कडू यांनी विरोधकांच्या संघर्षयात्रेवरही टीका केली. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

https://twitter.com/RealBacchuKadu/status/849221889432092672

दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. पनवेलमध्ये या संघर्षयात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान, काल संघर्षयात्रा पंढरपूरमध्ये पोहचली होती. यावेळी नेत्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेत सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी देण्याचं साकडं घातलं होतं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह जोगेंद्र कवाडे आणि इतर मंदिरापर्यंत चालत जात विठ्ठलाचं दर्शन घेतलं.

गोहत्येला जन्मठेप दिली जात असताना शेतकरी आत्महत्येबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका संतापजनक असल्याची टीका अजित पवार यांनी केली. संघर्षयात्रेचा आज पहिला टप्पा संपताच लगेचच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार असून कर्जमाफीशिवाय माघार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:
देशाचा पोशिंदा ऐतिहासिक आंदोलनाच्या तयारीत!