Ramdas Kadam Majha Katta : 1995 ला सेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असतानाही मला मंत्रीपद मिळाले नाही. फक्त मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो म्हणून मला मंत्रीपद मिळाले नसल्याचे मत शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी व्यक्त केलं. रामदास तुझ्यामुळं माझ्या घरात भांडणे चालली असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते असेही कदम म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रामदास कदम आले होते. यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला शिवसेनेतील प्रवास आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं.


मला मीडियाशी बोलू नको असे सांगण्यात आलं


बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी सांगतो की, अनिल परब यांच्याविरोधात मी काही केलं नाही. त्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे रामदास कदम म्हणाले. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. उद्धव ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यांचा आदेश मान्य करणे आम्हाला भाग पडत होते. मी मंत्री असतानाआदित्य ठाकरे  मला अधिकाऱ्यांच्या बैठका लावायला सांगत होते असेही कदम यावेळी म्हणाले. मागील तीन वर्षापूर्वी मला मीडियासमोर येऊ नको म्हणून सांगितले. मीडियाशी बोलू नको असे सांगण्यात आले. तरीपण मी गप्प बसलो. या तीन वर्षात मी फक्त एकच पत्रकार परिषद घेतल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. 


माझी भूमिका बदलली आहे


एवढ झालं तरी तुम्ही गद्दारच म्हणणार का? असा सवालही रामदास कदम यांनी केला. बाळासाहेबांच्या विचारांशी कोणी गद्दरी केली याचे उत्तर आहे का तमुच्याकडे असेही ते म्हणाले. कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं अशी माझी इच्छा होती. मात्र, आता माझी भूमिका बदलली असल्याचे रामदास कदम म्हणाले. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे नसल्याचे रामदास कदम म्हणाले.
 
आदित्य ठाकरे यांनी बोलताना थोडं भान ठेवाव


आदित्य ठाकरे आमदारांना गद्दार म्हणत आहे. त्यांनी बोलताना थोड भान ठेवलं पाहिजे असे रामदास कदम म्हणाले. त्यांचे वय 32 वर्ष आहे, माझे पक्षासाठी योगदान 52 वर्ष आहे. त्यांना अशी वक्तव्य शोभत नाहीत. त्यांनी जो बोलतो ते करुन दाखवाव असेही कदम म्हणाले. हे आमदारांचे बंड नाही हा उठाव आहे. मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंद करतो, तसेच आमदारांचे देखील अभिनंदन करतो असे रामदास कदम म्हणाले. पुढची अडीच वर्ष अशीच गेली असती तर शिवसेनेचे 10 आमदार देखील निवडून आले नसते असेही ते म्हणाले.