पुणे : मागील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे भाजपाला 122 जागा मिळाले होते. मात्र सत्तेत मला पाहिजे तसा वाटा मिळाला नाही, अशी खंत केंद्रीय सामाजिक मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण मुंबईच्या जागेचीही त्यांनी मागणीही केली.


रामदास आठवले पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी भाजपकडून मिळालेल्या वागणूकीबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. शिवसेना भाजपाची युती झाली ही समाधानाची बाब आहे. युती व्हावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. मात्र रिपब्लिकन पक्षाला बरोबर घेतल्या शिवाय निवडणून येणे अशक्य आहे, असं आठवले म्हणाले. माझ्याशी कोणी वाकडं वागले तर मी पण वाकडा आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

अमित शहा महाराष्ट्रात आले होते, तेव्हा मला बोलवायला हवं होतं. मात्र मला बोलावलं नाही. भाजप सत्तेत येण्यामध्ये आमचा मोठा वाटा होता. पण आम्हाला तशी वागणूक दिली नाही. मागच्या वेळी आम्हाला साताऱ्याची जागा दिली होती.  यावेळी दक्षिण ईशान्यची जागा द्यावी, अशी मागणीही आठवलेंनी केली. उद्धव ठाकरेंनी मोठं मन करुन दक्षिण मुंबईतील जागा मला सोडावी. माझा समाज या मतदार संघात मोठा आहे. इतर मतदार संघात त्यांना आमचा फायदा होईल, असंही ते म्हणाले.

युतीत योग्य वागणूक नाही मिळाली तर इतर पक्षाचे मार्ग माझ्यासाठी खुले आहेत. छगन भुजबळ आणि शरद पवार यांचा निरोप तर आहे. मात्र वेगळा निर्णय घेण्याचा अजून विचार नाही, असं ते म्हणाले.

माझी आणि समाजाची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकर आम्ही एकत्र यावं, मात्र तशी त्यांची इच्छा नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा फायदा युती सरकारला होणार, असं भाकितही त्यांनी यावेळी वर्तवलं.

मी जनतेत काम करतो म्हणून माझ्या नावाला वजन आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे संबंध चांगले आहेत. मला एक जागा द्यावी. शिवाय उद्या पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या घरी मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सदाभाऊ खोत, विनायक मेटे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पुढील दिशा ठरवले जाणार आहेत, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.