अमरावती : शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, त्यांना 15 आमदार मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतली आहे, असं वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केलं आहे. राज्यातल्या जनतेवर इतक्या लवकर निवडणुकांचा बोजा मी पडू देणार नाही, असं आठवले म्हणाले.


शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला, तरीही सरकार पडणार नाही, कारण 15 आमदार आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. राज्यातील जनतेला इतक्या लवकर निवडणुका नको आहेत. जर सरकार पडलंच, तर आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहोत. मात्र सरकार पडणारच नाही, कारण शरद पवार हे आतून आमच्या सोबत आहेत, असा दावा रामदास आठवले यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.

राणेंना रिपाइंत घेईन

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय अगदी योग्य वेळी घेतला असून फडणवीसांनी त्यांना लवकर पक्षात प्रवेश देऊन एखादं मंत्रिपद द्यावं, अशी आपली इच्छा आहे. पण जर त्यांना भाजपने प्रवेश दिला नाही तर आपण त्यांना रिपाइंमध्ये प्रवेश देण्यास तयार असल्याचंही रामदास आठवले म्हणाले.

दाऊदला कठोर शिक्षा द्यावी

दाऊद इब्राहीम आजारी असून भारतात येण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं, मात्र आपल्याला असं वाटत नसल्याचं आठवले म्हणाले. दाऊद सापडला तर आणूच, मात्र अमेरिकेने ज्याप्रकारे ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन ठार केलं, त्याप्रमाणे भारतानेही दाऊदला पकडून आणावं आणि कठोर शिक्षा करावी असं रामदास आठवले म्हणाले.