सांगली : ऊस दरवाढीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ऊस दराचा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीत जाण्याची मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही की त्यांना दिल्लीत किंमत नाही हे कळत नाहीत, असं राजू शेट्टी म्हणाले.


"अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, तसं मला आता फक्त उसाला दर हा एकच प्रश्न दिसत आहे. यासाठी मी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहे. जर येत्या काही दिवसात हा तिढा सुटला नाही, तर 11 नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात चक्काजाम आंदोलन आणि कडकडीत बंद पाळला जाईल", अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली.


शेतकऱ्यांचा संयम सुटला तर 2013 सालसारखा उद्रेक होईल. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असंही राजू शेट्टी म्हणले. आज आंदोलने होत असताना कारखानदार गप्प आहेत, यामागे सरकारच आहे. बेकायदेशीर वागणाऱ्या कारखान्यांच्या कृत्याला सरकार पाठीशी घालत आहे. सत्तेतील काही लोकांना नेहमी रक्तपात हवा आहे, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.


शेतकरी प्रश्नांबाबत पुढंपुढं मिरवणारे चंद्रकांत पाटील आता कुठे आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांच्याशी आता चर्चा करणार नाही. मुख्यमंत्र्यानी अन्य कोणीही माणूस चर्चेसाठी नेमावा अशी मागणीही खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.


सत्तेत असलेले आणि मंत्री असलेले सदाभाऊ खोतही आंदोलन करत आहेत हा मोठा विनोद आहे. ऊस दराच्या आंदोलनावावरून आम्ही दोघे एकत्र येऊ हे शक्य होणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.