ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - राजू शेट्टी
दूध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादीचा पाठिंबादूध आंदोलन अखेर मागे, राजू शेट्टींची घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2018 10:24 PM (IST)
दूध आंदोलनाबाबत राज्य सरकारचा निर्णय सकारात्मक असून, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असे खासदार राजू शेट्टींनी म्हटले.
नागपूर : चार दिवसांपासून महाराष्ट्रभरात सुरु असलेलं दूध आंदोलन अखेर मागे घेण्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. दूध दराबाबत सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर खासदार राजू शेट्टींनी नागपुरात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. खासदार राजू शेट्टी काय म्हणाले? दूध आंदोलनाबाबत राज्य सरकारचा निर्णय सकारात्मक असून, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असे खासदार राजू शेट्टींनी म्हटले. तसेच, जाहीर केलेले पैसे शेतकऱ्यांना मिळावेत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. प्रसंगी आम्ही सरकारशी भांडतो, मात्र दूध दराबाबतच्या त्यांच्या निर्णयाचं मोठ्या दिलाने स्वागत करतो, असे राजू शेट्टी म्हणाले. या क्षणापासून दूध आंदोलन मागे घेतो, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली. सरकारने दूध दराचा निर्णय जाहीर केल्यानंतर खासदार राजू शेट्टी नागपुरात दाखल झाले. त्यांनी रामगिरी निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दूध दराबाबत सरकारने काय निर्णय घेतला? दुधाला 25 रुपये प्रतिलिटर भाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर दूध संघांना लिटरमागे पाच रुपये अनुदान मिळणार आहे. 21 जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर महिन्याला 75 कोटींचा भार येणार आहे. सरकारकडून 5 रुपये प्रतिलिटर दूध संघाला देणार आहे आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकऱ्यांना मिळतील. प्रत्येक दूध संघाला या पाच रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देणं बंधनकारक असेल. तसेच, विक्री व्यतिरिक्त जे दूध शिल्लक राहील आणि त्याची दूध भुकटी तयार केली जाईल, तेवढ्याच दुधाला सरकार दूध संघाना अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भातील निवेदन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काही वेळापूर्वी विधानपरिषदेत सादर केलं. चार दिवसांपासून खासदार राजू शेट्टींचं आदोलन दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ने राज्यभरात आंदोलन सुरु केलं. या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी मुख्य शहरातील दूध पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरुच ठेवलं. राज्यभरात या दूध आंदोलनाचे मोठे पडसाद उमटताना दिसले. दूध उत्पादकांना लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दूध संकलन बंदीचे आंदोलन सुरु केले होते. संबंधित बातम्या : दूध दराचा तिढा सुटला, दूध उत्पादकांना प्रतिलिटर 25 रुपये दर