कोल्हापूर: माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी आता 'एकला चलो'चा नारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत करण्यात आली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. 


निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभा केली नाही. तर चळवळ टिकवी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असं राजू शेट्टी म्हणाले. सध्या भाजप सोबत जाण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला नाही असंही ते म्हणाले.


माजी खासदार राजू  शेट्टी म्हणाले की, "महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं. साताऱ्यातल्या सभेत पवार साहेब यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला. तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते. मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील जात नाही. ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काहीही संबंध नसलेले लोक घेतले. आमदाराच्या पुढ्यात बोलणार नाहीत ते कारखानदार यांच्यासमोर काय बोलतील. एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही अशा समितीच्या अहवालावरून निती आयोगाने एफआरपीचे तुकडे करण्याबाबत निर्णय घेण्याचं सांगितलं. निती आयोगाने सांगितलेल्या सूचनापेक्षा महाविकास आघाडी सरकारने आणखी कडक भूमिका घेतली."


महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले होतं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha