नवी मुंबई : भाजपकडून शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रा सुरु केली असताना भाजपच्या आमदार-खासदारांनी शेतकऱ्यांकडून चक्क पाय धुवून घेतल्याचे समोर आले. भाजपच्या या नेत्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली.


शेतकऱ्यांकडून पाय धुवून घेण्याची लायकी या भाजपच्या नेत्यांची नसल्याची जहरी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.

“ज्या व्यक्तींची उंची मोठी आहे, सन्मानजनक प्रतिमा आहे, त्यांच्या पायावर पाणी घालण्याची परंपरा आपल्याकडे आहे. मात्र, भाजपाच्या या आमदार, खासदारांनी केलेल्या कृतीचा किळस येत असून सत्तेच्या मस्तीत अजून किती दिवस शेतकऱ्यांना नागवणार?”, असा संतप्त सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

पुण्यातून 22 मे रोजी खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली. पुण्यातील फुले वाड्यात अभिवादन करुन आत्मक्लेश यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.

शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेला सुरुवात केली आहे.