छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, “शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली आहे. यांचा परिणाम पिककर्जवाटपावर झाला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. मात्र,जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे पीककर्ज मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.”
“शेतकऱ्यांना खरीप असो की रब्बी, हंगामासाठी जिल्हा बँक पीककर्ज पुरवठा करत असते. मात्र, नाशिक जिल्हा बँकेची वसुली रखडल्याने तसेच बँकेच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने जिल्हा बँक अडचणीत सापडली आहे. बँकेचे व्यवहार देखील ठप्प झालेले आहेत. पुरेसा चलनसाठा नसल्याने बँकेच्या रोखीच्या व्यवहारांवर बंधने आली आहे. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून आगामी खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध होऊ शकणार नाही. कर्ज मिळावे यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासनाने जिल्हा बँकेला पिक कर्जासाठी निधी उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे.”, असेही भुजबळांनी सहकार मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
“शासनाने जिल्हा बँकेला निधी उपलब्ध करून दिला तरच आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध होणार आहे. पिककर्ज न मिळाल्यास खरीप हंगाम धोक्यात सापडण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड संकटात सापडले असून, शेतकरी आत्महत्येचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. 1 जानेवारी 2017 ते 20 मे 2017 दरम्यान जिल्ह्यात 37 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पीककर्ज मिळणे गरजेचे आहे. तरी, शासनाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा.”, अशी मागणी छगन भुजबळ यांनी शेवटी केली आहे.
छगन भुजबळांचं पत्र :