Agriculture News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे. ऊस दर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह विविध शेती प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालंदर पाटील यांच्यासह इतर शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.


ऊस दर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नसल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील असा इशारा राजू शेट्टींनी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बैठकीचं आश्वासन दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आलं होते. दरम्यान, राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, बैठकीत निर्णय न झाल्यास शासन आपल्या दारी कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 


नेमक्या मागण्या काय?


आजच्या या बैठकीसंदर्भात एबीपी माझाने माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले आहेत. गेल्या वर्षभरापासून आम्ही ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करावी अशी मागणी करत असल्याचे शेट्टी म्हणाले. साखर कारखान्यांकडे असलेल्या अतिरीक्त पैशांची वाटणी शेतकऱ्यांना कशी करायची याचे सुत्र ठरवण्यासाठी समिती स्थापन करणं गरजेचं आहे. त्यासाठी कारखान्याचे ऑडीट होणे गरजेचे असल्याचे शेट्टी म्हणाले. तसेच २९ नोव्हेंबरला एकरकमी FRP देण्याचा कायदा करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली होती. दोन टप्प्यात FRP देण्याचा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली होती. याचा शासन निर्णय अद्याप झालेला नाही. अद्यापही 16 कोटी रुपयांची FRP कारखान्यांकडे शिल्लक असल्याचे शेट्टी म्हणाले. तसेच नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान अद्याप मिळालं नाही ते लवकरात लवकर मिळावे. ऊस तोडणी करणाऱ्या मुकादमांनी वाहन मालकांची फसवणूक केली आहे. अशा मुकादमांना अटक करावी. राज्यातील जवळपास 10 हजार वाहनमालकांची मुकादमांनी फसवणूक केली आहे. तसेच कांद्याला जसे अनुदान दिले तसे बेदाण्याला अनुदान द्यावे अशा मागण्या  आजच्या बैठकीत करण्यात येणार असल्याचे शेट्टी म्हणाले. तसेच पिक विमा, अतिवृष्टी याची नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे शेट्टी म्हणाले.


ऊस दर समिती स्थापन न झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका


गेल्या 14 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्याप दिलेली नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी मागणी केली आहे. तातडीने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणेसंदर्भात आदेश व्हावेत. राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समिती न नेमल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी मागणी केली आहे. ऊस दर समिती स्थापन न झाल्यामुळे राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी गेल्या दोन हंगामातील अद्याप उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रूपये साखर कारखानदार बिनव्याजी वापरत असल्याचे शेट्टी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचं आंदोलन स्थगित, बहुतांश मागण्या मान्य; आठ दिवसांचा अल्टिमेटम