नवी मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे. आत्मक्लेश यात्रेनिमित्त त्यांनी 100 किमीहून अधिक पायी प्रवास केल्यामुळे त्यांच्या पायाला फोड आले आहेत आणि पाय सूजले आहेत.


खासदार राजू शेट्टी यांचा रक्तदाबही कमी झाला असून, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. शेट्टी यांना आरामाची गरज आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.



स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा सध्या पनवेलजवळ पोहोचली आहे.

पुण्यातून 22 मे रोजी खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली. पुण्यातील फुले वाड्यात अभिवादन करुन आत्मक्लेश यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. आता यात्रा पनवेलमध्ये पोहोचली आहे.



शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेला सुरुवात केली आहे.