नंदुरबार : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी विरोधकच काय, तर वेळ प्रसंगी सैतानाची मदत घेण्याचीही आमच्या पक्षाची तयारी असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.


खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात नंदुरबारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वामीनाथन आयोग लागू करण्यासोबत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी मोर्चा आयोजित केला होता. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

मी शेतकऱ्यांसाठी संघटना काढली असून शेतकऱ्यांसाठीच राजकारण करतो. त्यामुळे सत्तेत जरी असलो, तरी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी नेहमीच रस्त्यांवर उतरेन, असेही राजू शेट्टींनी सांगितले.

“दुर्दैवाने जे पक्ष कालपर्यंत शेतकऱ्यांच्या हमी भावाची भाषा करत होते, ते आज सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तर आत्महत्या थांबतील का, याबाबत शाश्वती मागत आहेत. तर काल जे सत्तेत होते आणि ज्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या मोर्चांवर गोळ्या झाडल्या गेल्या, तेच आज सातबारा कोरा करण्याची मागणी करत आहे. मात्र, आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आम्ही ज्याची ज्याची मदत मिळेल, त्यात अगदी सैतानाची मदत मिळाली तरी ती घेऊ”, असा टोला लगावला.