“छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त महाराष्ट्राची, देशाची शान व् अस्मिता आहे. राज्याच्या जनतेच्या पैशातून शिवस्मारक उभारले जात आहे, याचा सर्वांना अभिमान आहे. मात्र, भाजपकडून असा आव आणला जात आहे, जणू ते एकटेच करते-सवरते आहेत.”, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर केली.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपची खासगी मालमत्ता असल्याचा अविर्भाव आणला जात आहे, ते योग्य नाही.”
भाजपवर कठोर शब्दात टीका करताना राजू शेट्टी यांनी जेम्स लेन प्रकरणाचा दाखला देत सवालही केला आहे की, “आता अचानक महाराजांच्या नावाचा वापर करणारे ‘जेम्स लेन’ प्रकरणाच्या वेळी कोणत्या बिळात दडून बसले होते?”
खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यमान राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. शिवाय, सदाभाऊ खोत हे राज्यमंत्रीही आहेत. या सर्व गोष्टी पाहता खासदार राजू शेट्टी यांची भाजपविरोधातील तीव्र नाराजी नक्कीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांच्या टीकेवर अद्याप भाजपच्या गोठातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.