कोल्हापूर: शेतकऱ्यांना टोपी घालण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमत आहे, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.  साखर कारखानदार यांनी काढलेल्या कर्जाचे संकट दिसते मात्र शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाचे संकट या नेत्यांना दिसत नाही का? असा सवाल देखील यावेळी राजू शेट्टी यांनी केला.


Kolhapur : आमचा दसरा कडवट झाला तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही : Raju Shetti


स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद उद्या म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या ठिकाणी होणार आहे. या ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी राजू शेट्टी यांनी आजरा या ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना राजू शेट्टी यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 



एफआरपी एकरकमी दिल्यास साखर कारखान्याने सूतगिरणी प्रमाणे बंद पडतील, अशा पद्धतीची वक्तव्य काही नेते करत आहेत.. मात्र शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाबाबत ते बोलण्यास तयार नाहीत..केंद्र सरकारला एफआरपीचे तुकडे करायचे आहेत... तर त्याला शरद पवार यांचे देखील समर्थन दिसत आहे...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी कायदे करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत..त्यामुळे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना टोपी घालण्याबाबत एकमत झाले असल्याची टीका यावेळी शेट्टी यांनी केली.


यंदा साखरेचे भाव वाढले तरी एफआरपी पेक्षा जास्त रक्कम देणे अशक्य : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील 


काळी दाढी पांढरी झाली तरी लढा संपला नाही- शेट्टी


उसाच्या पिकाला चांगला दर मिळावा यासाठी गेली 20 वर्षे ऊस परिषद घेऊन उसाच्या दराची मागणी करत आहे. 20 वर्षांपूर्वी असणारी माझी काळी दाढी पांढरी झाली मात्र उसाच्या दराचा लढा अद्याप संपलेला नाही. आम्ही महाविकासआघाडी सोबत असलो तरी शेतकरीविरोधी निर्णयांना नेहमीच विरोध करत राहणार असे आव्हान देखील राजू शेट्टी यांनी दिलं आहे. राजू शेट्टी आता उद्या होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये नेमकं काय बोलतात याकडे सर्व शेतकरी आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.