स्वराज्याच्या राजधानीचं पुनर्बांधणीचं काम ठप्प
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 06:09 PM (IST)
पुणे: फेब्रुवारी महिन्यामध्ये स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाच्या ढासळलेल्या भागाचं पुनर्बांधणीचं काम मोठ्या जोमानं सुरु झालं. कोसळलेले गडाचे बाहू सावरले जात होते. त्यामुळे राजगडावर पुन्हा शिवकाळ अवतरेल असं अनेकांना वाटत होतं. पण आठ महिन्यांनंतरचा राजगड आता पाहावत नाही. कारण पुनर्बांधणीचं बांधकाम आता पूर्णपणे ठप्प झालं आहे. 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीनंतर पद्मावती माची, संजीवनी माची, सुवेळा माचीचं पुनर्बांधणीचं काम सुरु झालं. यासाठी पायथ्यापासून दगडं आणले जात होते. पण आता तेही बंद झाल्याने गडाची दुरावस्था कायम आहे. राज्य सरकारने या पुनर्बांधणीसाठी 5 कोटींच्या निधीसह ज्या ठेकेदाराला हे काम दिलं होतं. पण त्या ठेकेदाराला सिंहगडावरचे निकृष्ठ काम केल्याप्रकरणी सरकारनं त्याला काळ्या यादीत टाकलं. त्यामुळे राजगडावरचं कामही बंद पडलं आहे.