मुंबई : राज्यात ऑक्सिजन वाहतुकीसाठी आणि गतीनं आणण्यासाठी आता एअरफोर्सचीही मदत घेतली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ऑक्सिजन इतर राज्यातून येण्यासाठी उशीर होत आहे. विशाखापट्टणमहून ट्रेन येत आहे पण उशीर झाला आहे. आता ज्या राज्यातून ऑक्सिजन मिळेल तिथे रिकामे टँकर्स एअरलिफ्ट केले जाणार आहेत. एअरफोर्सच्या माध्यमातून रिकामे टँकर्स पाठवले जाणार आहे. यामुळं ऑक्सिजन मिळण्यात गती प्राप्त होईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.  


आज पंतप्रधान मोदी यांनी ज्या राज्यात कोरोना रुग्ण जास्त आहे त्या राज्यांशी चर्चा केली. 9 ते 10 मुख्यमंत्री या कॉन्फरन्सला होते. या बैठकीनंतर राजेश टोपे बोलत होते. ते म्हणाले की, ऑक्सिजन देताना आपली संख्या 7 लाख आहे त्यात 10 टक्के क्रिटिकल होतात. न्यायीक पद्धतीने मिळावं ही मागणी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑक्सिजन,रेमडेसीविर आणि लस न्याय हक्काने मिळाली पाहिले. आपल्या संख्येनुसार मिळालं पाहिजे, असे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले असल्याचं देखील टोपेंनी सांगितलं. 


PSA प्रकल्प टाकता येतील का तर आपण ते करायला सांगितलं. फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये हवेतील नायट्रोजन शोषून ऑक्सिजन सोडतात, अशा इंडस्ट्री असतील तोच प्लांट वापरता येईल.  आपल्या राज्यासाठी सिलेंडर कमी पडले 10-12 हजार सिलेंडर मागितले असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. 


साखर कारखान्याबाबात शरद पवार साहेबांनी सूचना दिल्या आहेत. सिलेंडर मागवले आहेत.  जमेल त्या मार्गाने कशी उपलब्धता वाढवता येईल करत आहोत.  ऑक्सिजन संदर्भात ऑक्सिजन ऑडिट करा. वेस्टेज टाळा, एक राज्यातून दुसऱ्या राज्यात ऑक्सिजन जात असताना अडवू नये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं असल्याचं टोपेंनी सांगितलं.


टोपे म्हणाले की, रेमडेसिवीर केसेसच्या तुलनेत ते मिळावं, याबाबत योग्य निर्णय केंद्र सरकार घेईल असं  वाटतं. पंतप्रधानांनी सांगितलं ब्लॅक मार्केटिंग थांबलं पाहिजे, राज्याने ते करावं आम्ही ते करू. एकत्र येऊन एकजुटीने काम करणे गरजेचे आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं असल्याचं टोपे म्हणाले.