अहमदनगर : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना समजावू शकत होतो. ते विरोधकांचे ऐकत असत. मात्र मोदी विरोधकांचे ऐकतच नाहीत, असा गंभीर आरोप ‘जलपुरुष’ राजेंद्र सिंह यांनी केला आहे. अहमदनगरला ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेत  बोलत होते.


राजेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले?

“राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पामुळे देशाला मोठा धोका आहे. मात्र यासंदर्भात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना समजावू शकत होतो. ते मोठ्या मनाचे आहेत आणि विरोधकांना ऐकत होते. मात्र विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतच नाहीत.”, असे राजेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

"गंगा जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत निराशा"

गंगा जलशुद्धीकरण प्रकल्पावर बोलताना पंतप्रधानांनी निराशा केल्याचा आरोप राजेंद्र सिंहांनी केला. “गंगा जलशुद्धीकरणासाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र दोन टक्केही खर्च झाले नाही.”, असा आरोप राजेंद्र सिंहांनी केला. तसेच, मोदींमध्ये फार आशा दिसत होती, मात्र मोदींनी निराशा केल्याची खंत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना राजेंद्र सिंह यांनी नदीजोड प्रकल्पावर गंभीर अक्षेप घेत, अनेक राज्यात आणि केंद्रात एकहाती सत्ता असूनही नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी झाली नसल्याचे राजेंद्र सिंहांनी निदर्शनास आणून दिले आहे. सतलज, यमुना आणि व्यास प्रकल्पाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचं त्यांनी नमूद केले.

“दोन्ही ठिकाणी एकच सरकार असताना शक्य झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीय नद्या जोड फार दूर आहे. या प्रकल्पाने देशात अपात्कालीन संकटांचं संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारला थांबावं लागेल.”, असं अवाहन राजेंद्र सिंह यांनी केलं.

यावेळी राजेंद्र सिंह यांनी जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केलं आहे. जलयुक्त शिवार देशातील सर्वोत्तम योजना आहे. मात्र ठेकेदारमुक्त अंमलबजावणीची गरज त्यांनी व्यक्त केली. जलयुक्त शिवार तीन वर्षांपूर्वी आदर्श योजना होती. मात्र मध्यंतरी ठेकेदारांचा हस्तक्षेप वाढला होता. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने योजना मार्गावर आल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आता पाण्यानुसार पीक नियोजन करण्याची गरज राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे. देशात फक्त महाराष्ट्रातच जलसाक्षरता सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं.