धुळे : भाजपात गुंडांची टोळी प्रवेश करत आहे. मुंबईत राजन गँग भाजपसाठी काम करत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत केला. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत रणधुमाळीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी नवाब मलिक धुळ्यात आले होते.


यावेळी त्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये 20 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप देखील केला. पर्यटन विभागात 18 महिन्यात 6 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात, या मागचं नेमकं कारण काय? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

सध्या राज्यावर 5 लाख कोटींचं कर्ज आहे.  शिर्डी संस्थांकडून 500 कोटींचं घेतलेलं कर्ज हे मंदिराच्या तिजोरीवर हात मारण्याचा राज्य सरकारचा कार्यक्रम असल्याचं नवाब मलिक म्हणाले. यावेळी उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्याबद्दल नवाब मलिक यांनी ठाकरे यांची पाठराखण केली.

लोकमंगल पतसंस्थेच्या घोटाळ्याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं नाव एफआयआरमध्ये दाखल करत देशमुख यांना अटक करून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी  मलिक यांनी केली.