Maharashtra Politics  गोंदिया : आगामी निवडणूक लढवताना माझी मनापासून इच्छा आहे की ही निवडणूक माझा मनसैनिक जो एवढ्या वर्षापासून माझ्यासोबत उभा आहे, तो ही निवडणूक लढताना दिसला पाहिजे. मला बाहेरून माणसं आणून निवडणूक लढवायची नाही. मला माझ्यासोबतच्या  मनसैनिक निवडणूक लढताना आणि ती जिंकताना पाहायचे आहे. पण तुम्ही तशी परिस्थिती आणली, तर माझा नाईलाज राहील. असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलताना व्यक्त केलंय. 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS)पक्ष  देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. तर   मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर आजपासून राज ठाकरे विदर्भ दौरा करणार आहे. दरम्यान, आज राज ठाकरे गोंदियात आले असता ते पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.  


मला तुम्हाला देखील प्रस्थापित होताना पाहायचंय- राज ठाकरे


प्रत्येक पक्ष सुरुवातीला लहानच असतो. इतर पक्षांचे ज्यांचे आज आमदार आहेत, खासदार आहेत, ते पक्ष आले तेव्हा टीचभरच होते. या देशात काँग्रेस सोडून कोणीच नव्हतं. जे काही आले ते सर्व नंतर आले आणि हळूहळू प्रस्थापित होत गेले. मला तुम्हाला देखील प्रस्थापित होताना पाहायचा आहे, तुमच्यापैकी खासदार आणि आमदार होताना मला पाहायचे आहे. तुमच्या शहराची नगरपालिका तुमच्या हातात, पक्षाच्या हातात पहायची आहे. तुम्ही हा विचार कधीच मनात आणू नका की, हे एवढे प्रस्थापित आणि मोठे पक्ष आहे, यांच्यासोबत आपण कसं लढणार? ते कसे लढले? जर तुम्हालाही आत शिरायची इच्छा असेल, प्रस्थापित व्हायचे असेल, तर त्यासाठी जे काही करायला हवं ते तुमच्याकडून झालं पाहिजे. नाही तर तुम्ही नेहमीच विस्थापित राहणार, कधीच प्रस्थापित होणार नाही.


ज्यांच्याकडे पद आहेत त्यांनी पक्षाची बांधणी नीट केली नसेल आणि नुसतं पद घेऊन ते उबवत बसले असेल तर काही होऊ शकत नाही. पदाधिकाऱ्यांच्या कामाची माहिती मी घेईलच. जिल्हा पासून शाखेपर्यंत पक्षाचे एवढे पद असतात पदाधिकाऱ्यांच्या अवतीभोवती कार्यकर्ते असतात. त्यांच्या पोटात काम करण्याची इच्छा असेल, आग असेल आणि तुम्ही त्यांना योग्य जबाबदारी देत नसाल, तर ते काय फक्त तुमच्या अवतीभवती फिरण्यासाठी आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी मनसेसैनिकांना संबोधित करत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्याय. 


महाराष्ट्राचा राजकारण पूर्वी असं कधीही नव्हतं


आपल्या पक्षात गट अध्यक्ष सर्वात प्राथमिक पद आहे. 250 माणसांवर एक गट अध्यक्ष, अशी बांधणी झाली पाहिजे. गट अध्यक्ष त्या अडीचशे माणसांसोबत उठला बसला पाहिजे. त्या अडीचशे माणसांसाठी तो राज ठाकरे असला पाहिजे. निवडणुका लागल्या तर निवडणूक लढायच्या आहेत. त्यामुळे मला उमेदवारी देऊन लोकांकडून पैसे घेणारी माणसं नकोय. जर उमेदवारी मिळत असेल तर मला पूर्ण ताकतीने काम करून निवडणूक लढताना दिसले पाहिजे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते काही चांगलं लक्षण नाही. लोकांनी विश्वास ठेवायचा, आमदार म्हणून निवडून द्यायचं आणि नंतर तो विकला जातो. लोकांनी का मतदानाच्या रांगेत उभे राहायचं आणि त्यांनी निवडून आल्यानंतर आपली सोय बघायची, पैसे कमवायचे. महाराष्ट्राचा राजकारण पूर्वी कधी असं नव्हतं 


माझी मनापासून इच्छा आहे ही निवडणूक लढवताना माझा मनसैनिक जो एवढ्या वर्षापासून माझ्यासोबत उभा आहे, तो निवडणूक लढताना दिसला पाहिजे. मला बाहेरून माणसं आणायची नाही. पण तुम्ही तशी परिस्थिती आणली, तर मला नाइलाज असेल, त्याला  मी काय करणार? असेही राज ठाकरे म्हणाले. 


तरच मी निवडणूक लढवण्याचा विचार करेल


दिवाळीनंतरच्या  जवळपास निवडणुका लागतील. कदाचित 15 ऑक्टोबरच्या जवळपास आचारसंहिता लागेल. तोवर तुम्ही पक्षाची बांधणी करून देणार का? कागदावरची बांधणी चालणार नाही. माझी माणसं येऊन सर्व तपासनार. तेव्हा तुम्हाला पक्षाची खरी बांधणी दाखवावी लागेल, संघटन दाखवावे लागेल, ते दाखवले तरच मी निवडणूक लढवण्याचा विचार करेल. असेही राज ठाकरे मनसेसैनिकांना संबोधित करताना म्हणाले.  


हे ही वाचा