Raj Thackeray Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada)  झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं. असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी सरकारकडे मागणी केली आहे. समाजमध्यमांवर पोस्ट करत राज ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. 


त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील- राज ठाकरे


हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार राज्यासह मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे  (Heavy Rain) अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय. तर, पावसामुळे अनेक प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसल्याचे चित्र आहे. याच परिस्थितीवर भाष्य करत राज ठाकरे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारसह आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही सूचना दिल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं.


यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे, अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे. किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल. असा खोचक टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे. या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये. सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं. असेही ते म्हणाले.  


हे ही वाचा