औरंगाबाद : मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी चर्चा केली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मुंबईत मनसेने महामोर्चा काढला होता. या मोर्चानंतर राज ठाकरे यांना 'हिंदू जननायक' असं म्हटलं जाऊ लागलं होतं. मात्र मला हिंदू जननायक म्हणू नका असं राज ठाकरेंनी सर्वांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. मनसेच्या मोर्चावर शरद पवारांनी टीक केली होती. त्याविषयी बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं की, शरद पवार आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. राजकारणाच्या पलिकडे संबंध जपले जातात, महाराष्ट्राची तशी राजकीय परंपरा आहे.


झेंडा बदलला, भूमिका कायम


मनसेच्या बदलेला झेंडा आणि बदलेल्या भूमिकेविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, मी माझ्या पक्षाचा केवळ झेंडा बदलला आहे. पक्षाची भूमिका आधी जी होती तीच कायम आहे. जे पक्ष आज स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेत आहेत, त्यांनी कधी भूमिका घेतली का? त्यांना तुम्ही विचारलं का? असा सवाल राज ठाकरे विचारला. नव्या झेंड्याबाबात कोणतीही नोटीस आली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.



औरंगाबादचं नाव बदललं तर हरकत काय?


औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना हा मराठवाडा दौरा आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकांमध्ये लावलेल्या बॅनर्सवर औरंगाबादऐवजी 'संभाजीनगर' असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. औरंगाबादच्या नामकरणाच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदललं तर काय हरकत आहे? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत, असा टोला यावेळी राज ठाकरेंनी शिवसेनेला लगावला.


संबंधित बातम्या




Raj Thackeray Uncut Speech | घुसखोरांची साफसफाई आता झालीच पाहिजे : राज ठाकरे