औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा 418 मतांनी विजय झाला. दानवे यांनी आघाडीच्या बाबुराव कुलकर्णी यांचा 418 मतांनी पराभव केला. त्यामुळे मागील निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचे 330, महाआघाडीकडे 250 तर एमआयएम आणि अपक्ष मिळून 77 असे एकूण 657 मतदार होते.


या निवडणुकीसाठी 19 ऑगस्टला मतदान झालं होतं. तर आज (22 ऑगस्ट) सकाळी आठ वाजता मतमोजणीला  सुरुवात झाली. अवघ्या एका तासाभरात निकाल जाहीर झाला. एकूण 647 वैध मतांपैकी 14 मतं बाद झाली. अंबादास दानवे यांना 524 मतं मिळाली, तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांना 106 मतं मिळाली. याशिवाय अपक्ष उमेदवार शहानवाज खान यांना 3 मतं मिळाली.

शिवसेनेचे अंबादास दानवे हे पहिल्याच फेरीत विजयी झाले. महत्त्वाचं म्हणजे युतीची 294 मतं असताना अंबादास दानवे 418 मतं घेऊन विजयी झाले. 19 तारखेला झालेल्या मतदानात 657 पैकी 647 मतदारांनी आपला हक्क बजावला, तर 10 सदस्य गैरहजर राहिले होते. एमआयएमच्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर शिवसेना-भाजप युतीच्या विजयात एमआयएमचा हातभार असल्याचं आज स्पष्ट झालं आहे.

पक्षीय बलाबल
शिवसेना-भाजप : 330 मतं
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी : 250 मतं
एमआयएम आणि अपक्ष : 77 मतं