अहमदनगर : सध्या भारतात #MeToo या लैंगिक शोषणाविरुद्धच्या मोहिमेचं वादळ सुरु आहे. अनेक क्षेत्रातील महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारावर बोलत आहेत. पण अत्याचार झाला तेव्हाच का बोलत नाही, असा सवाल अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी केला आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथे उत्कर्ष या मल्टिस्टेट पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधूताई सपकाळ आल्या असताना त्यांना मी टू मोहिमेवर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अत्याचार होतो त्याचवेळी याविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

10 वर्षांनंतर असे आरोप करणं हे चुकीचं आहे. काळजात कळ उठते तेव्हा माणूस गप्प राहू शकत नाही. त्यामुळे जेव्हा अत्याचार झाला तेव्हाच आवाज उठवत का नाही? अत्याचारासाठी शिक्षा ही ठरलेली आहे, असं त्या म्हणाल्या.

या प्रकरणांमुळे जे दोषी नाहीत त्यांना सुद्धा शिक्षा भोगावी लागत आहे. आरोप करणारी महिला ही कुणाची तरी पत्नी, बहिण आणि आई आहे. तसेच पुरुष सुद्धा कुणाचा तरी मुलगा, भाऊ आणि वडील आहे, असं सिंधुताई म्हणाल्या.