मुंबई: येत्या तीनदिवसात  राज्यात मुसळधार पावसाची एण्ट्री होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचं कमबॅक होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पीकं करपल्यानं हतबल झालेल्या बळीराजालाही दिलासा मिळणार आहे.


तसंच मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढच्या 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे डोळे मोठ्या पावसाकडे

बिहार-उत्तर प्रदेशात पावसाचं थैमान सुरु असताना, महाराष्ट्राचे डोळे मात्र मोठ्या पावसाकडे लागले आहेत.

मराठवाडा आणि विदर्भातील जिल्हे ऐन पावसाळ्यातही कोरडे ठाक पडले आहेत. तर पावसाने दडी दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातही जमीनीला भेगा पडत आहेत.

दुष्काळामुळे शेतकरीवर्ग पूरता हतबल झाला आहे. लातूरच्या औसा तालुक्यात 2 भावांनी साडे सहा एकरात सोयाबीन पेरलं, मात्र वरूणराजानं दही मारल्यानं 2 लाख खर्चून पेरलेल्य़ा सोयाबीनची माती झाली.

जुलैमध्ये 355 पैकी तब्बल 223 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्केही पाऊस झाला नाही. त्यात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्केही पावसानं कृपा दाखवली नाही.

त्यामुळे घाम गाळून, कष्ट करून पेरलेल्या पीकाची डोळ्यासमोर अशी माती होत असल्यानं बळीराजा हतबल झाला आहे.