मुंबईत पावसाची विश्रांती, रायगडात अतिवृष्टीचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2017 07:42 AM (IST)
प्रातिनिधीक फाईल फोटो
मुंबई : मुंबईला बुधवारी दिवसभर पावसानं झोडपल्यानंतर गुरुवारी पहाटेपासून थोडीशी विश्रांती घेतली आहे. मुंबईसह उपनगरात सध्या पावसानं उघडीप दिली असली तरीही कल्याण, डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे परिसरात पावसाची उघड झाप सुरु आहे. सध्या मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा सुरळीत आहे. रस्त्यावरही पाणी न साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थित सुरु आहे. रायगडला सतर्कतेचा इशारा गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेली गावं, वस्त्यांची माहिती खोपोली, ठाणे, तहसील कार्यालयाला देण्यात आली आहेत. पुराचा तडाखा बसण्याची शक्यता असणाऱ्या गावांना, जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणात समुद्राला उधाण दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर पावसाची संततधार सुरुच आहे. कोकणात सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण दोडामार्ग भागात रात्रभर मुसळधार पाऊस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस असल्याने मालवणच्या समुद्राला उधाण आलं आहे. समुद्र किनारी सोसाट्याचा वारा आणि फेसाळणाऱ्या लाटाही किनाऱ्याला धडकत होत्या. महाबळेश्वरचं सौंदर्य खुललं सातारा आणि महाबळेश्वर परिसरात तुफान पाऊस बरसला. महाबळेश्वर कोयना परिसरात पावसाचा जोर चौथ्या दिवशीही कायम आहे. त्यामुळे निसर्गाचं रुपही पालटलं आहे. अनेक ओढे-नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे धबधब्यांचं सौंदर्यही खुललं आहे. सह्याद्रीच्या कुशीतील म्हणजेच महाबळेश्वरमधील लिंगमळ्यातील धबधबाही ओसंडून दरीत कोसळताना दिसत आहे. चोवीस तासात झालेल्या पावसामुळे कोयना धरणात तब्बल पाच फुटानं वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कोयना धरण परिसरात 170 मिलीमीटर इतका पाऊस झाला.