मुंबई : गेल्या काही दिवसात पर्यटन स्थळांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये पर्यटन स्थळांवर दारुबंदी करण्यात आली आहे. सोबतच उरण तालुक्यातील समुद्रकिनारे आणि धरणांच्या परिसरही जाळ्या लावून पर्यटकांसाठी बंदी करण्यात आली आहे.


 

उरण तालुक्यातील रानसई धरण आणि पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पावसाळ्यात मुंबई परिसरातून हजारो पर्यटक येतात. रानसई धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या पाण्यात उतरतात. रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खालापूर परिसरातील धरण आणि धबधब्यांवर जमावबंदी केल्यानंतर उरण तालुक्यातील पर्यटन स्थळांवर दारू बंदी करण्यात आली आहे . धरणाखालच्या पट्ट्यात जाळी लावून पर्यटकांना बंदी करण्यात आल्याने अनेक पर्यटक नाराज झाले आहेत.

 

या  मार्गावर  पोलिसांनी  मोठ्या प्रमाणात  नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यामुळे पर्यटन स्थळावर 'झिंगाट'  होण्यासाठी जाणाऱ्या  पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.  पोलिसांच्या या कारवाईचे काही पर्यटकांनी स्वागत केले असून समुद्रकिनाऱ्यावर होणारी गर्दीही कमी होणार आहे.