मुंबई : गेल्या 24 तासात पावसानं महाराष्ट्रातील अनेक भागांना अक्षरश: झोडपून काढलं. मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी पुढी 48 तास धोक्याचे असून, अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.


 

याचा फटका किनारपट्टीलगतच्या भागांनाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे किनारपट्टीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गंगापूर धरण तुडुंब

 

मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण तुडुंब भरलं आहे. सध्या या धरणातून 2 हजार 740 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे. तसंच नदीच्या इतर भागातही जोरदार पाऊस सुरु असल्यानं नाशकात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

दुसरीकडे पेठ, इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरमध्येही गेल्या २४ तासांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसानं काल मुंबई-नाशिक महामार्गावरच्या वाहतुकीचा वेगही मंदावला होता.