रायगडासाठी 600 कोटींच्या विकास आराखड्याला केंद्राची मंजुरी
रश्मी पुराणिक, एबीपी माझा | 23 Mar 2017 04:19 PM (IST)
मुंबई : रायगड किल्ल्यावरील वृक्षारोपणाच्या उपक्रमातून 12 हजार 375 झाडे लावण्यात आली होती. त्यापैकी 7 हजार 175 झाडे जिवंत आहेत. रायगड किल्ल्याच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारने 600 कोटी रुपयांच्या आराखडयाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मान्यतेनुसार रायगड किल्ल्यावरील कामे येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. रायगड किल्ल्यावर वृक्षारोपणाच्या उपक्रमातून लागवड केलेल्या वृक्षांचे योग्य संवर्धन न झाल्याबद्दलचा प्रश्न अतुल भातखळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता. रायगड किल्ल्यावर जलवाहिनी टाकण्याचे काम पुरातत्व खात्याच्या अखत्यारित सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रायगड किल्ल्यावर झाडांसाठी तसेच अन्य विकासकामांसाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.