पुणे : पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवून प्रस्तावावर लवकर पाऊल उचलण्याची मागणी केली आहे.


"औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. आता पुण्याचं नाव बदलून जिजापूर करावं," अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

"पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचा अर्थात जिजाऊंचा वसा आणि वारसा आहे. जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवत हे शहर वसवलं. 1630 मध्ये विजापूरच्या आदिलशाहने पुणे शहराची लूट केली, त्यावेळी भीतीमुळे तिथे कोणीही राहण्यास धजावत नव्हतं. पुणे आता ज्या स्थितीत आहे, ते जिजाऊंच्या योगदानामुळे, ते कोणीही विसरु शकणार नाही," असं संतोष शिंदे यांनी सांगितलं.



"छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे सरकार स्थापन झालं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. त्यामुळे या प्रस्तावावर कोणीही निषेध करणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे," असंही संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.

याबाबत आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचं संतोष शिंदे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी आमची मागणी सरकारपर्यंत योग्यारित्या पोहोचवतील अशी आशा असल्याचंही शिंदे म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचं नाव प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या केलं. त्यानंतर उस्मानाबाद, औरंगाबादचं, अहमदाबाद आणि हैदराबादचं नाव बदलण्याची मागणी जोर धरु लागली आहे.