पुणे: “मागे एका व्यक्तीने वक्तव्य केलं की माझं बोट पकडून ते राजकारणात आले. हे वक्तव्य करणारी व्यक्ती अशी होती की मला मोठी काळजी वाटायला लागली. त्यामुळं मी काही दिवस दिल्लीला जाणंच सोडलं", असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. ते पुण्यात बोलत होते.


पक्षीय भेद बाजूला ठेवून राजकारणात सलोखा निर्माण केला पाहिजे, असे संस्कार यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला दिले, त्यामुळं आम्ही विरोधीपक्षांशीही सलोख्याचे संबंध ठेवतो, त्याचा मोदींनी उल्लेख केला असावा असं शरद पवार म्हणाले.

“मी जेव्हा देशाचा कृषीमंत्री झालो, तेव्हा भारताला परदेशातून धान्य आयात करावं लागत होतं. त्यामुळे मी अस्वस्थ होतो. देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विविध विषयांसंदर्भात केंद्र सरकारच्या मंत्र्यांशी बैठका व्हायच्या. त्यामधे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका केंद्र सरकारबद्दल नेहमी आक्रमक असायची. त्यामुळे मंत्र्यांची भूमिकाही तशीच असायची. मात्र माझी भूमिका ही सर्वांच म्हणणं ऐकूण घेण्याची होती”, असं पवारांनी नमूद केलं.

गुजरातमधील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करुन, अन्न-धान्याचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न जर त्या राज्याचे मुख्यमंत्री करत असतील, तर त्यांच्या मागे देशहितासाठी उभं राहिलं पाहिजे अशी माझी भूमिका होती. त्यामुळे कदाचित ते म्हणाले असावेत की माझं बोट धरुन राजकारणात आलो. परंतु राजकारणात असं कोणी कोणाचं बोट धरुन येत नाही. मात्र प्रशासकीय निर्णय घेत असताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवायचे असतात, याची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी आम्हाला दिली होती. त्यानुसार आम्ही काम करतो, असं पवार म्हणाले.



संबंधित बातम्या

पवारांनीच राजकारणात मला बोट धरुन चालायला शिकवलं: मोदी


प्रणवदांनी बोट धरुन वडिलांप्रमाणे मार्गदर्शन केलं : मोदी