Pune News : स्मार्ट सिटी पुण्यात मृत्यूनंतरही मृतदेहाची (Pune crime news) थट्टा सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका कुटुंबीयांना सोयी सुविधा वेळेत न मिळाल्याने मृतदेहाला कुटुंब रात्रभर रिक्षात घेऊल फिरावं लागलं आहे. आजीचा मृत्यू झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी कुटुंबाला ना ॲम्बुलन्स मिळाली, ना शवगृह मिळालं. पुणे शहरातील कॉन्टेन्टमेन्ट भागातून हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे कुटुंबियांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त  केला आहे. 


पुणे शहरातील कॉन्टेन्टमेन्ट येथे एका कुटुंबावर रात्रीच्या वेळी मृतदेह घेऊन वणवण फिरण्याची वेळ आली आहे. याला प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. प्रमोद चाबुकस्वार यांचं कुटुंब आजीचा मृतदेह घेऊन फिरत होते. रात्री 10 वाजता प्रमोद चाबुकस्वार नवा मोदीखाना कँप येथून केवळ 500 मीटर अंतरावरील एका रुग्णालयात घरी मृत्यू झालेल्या 95 वर्षीय आजीला शवगृहात ठेवण्यासाठी निघाले होते. नातेवाईकांनी बोर्डाचे धोबी घाट येथील वाहन तळ गाठले. मृतदेह रिक्षातून रूग्णालयातल्या शवगृहात ठेवण्यासाठी आणला तर शवगृहही बंद पडलेलं होतं. काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे शवगृह बंद आहे, असं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आजीचा मृतदेह रिक्षानेच ससून रुग्णालयात नेला नंतर प्रक्रिया सुरु केली.


मृत जीवाचा खेळ मांडला?


या सगळ्या घटनेमुळे सध्या आरोग्य प्रशासनावर संतापालची लाट उसळली आहे. कोणी रात्री फोन उचलला नाही तर रुग्णवाहिकेला चालक मिळला नसल्याने जीवाचा खेळ मांडल्याच्या प्रतिक्रियाही सगळीकडून उमटत आहे. सोबतच लाखो रुपये खर्च करुन शवगृह बांधण्यात आली आहेत. मात्र त्यातदेखील योग्य सोय नाही आणि तांत्रिक बिघाडामुळे ते बंद आहे. त्यामुळे या शवगृहांचा नक्की उपयोग का?, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 


कॉन्टेन्टमेन्ट बोर्ड महापालिकेत विलीन करा?


कॉन्टेन्टमेन्ट बोर्ड नागरिकांना योग्य सोयी सुविधा पुरवत नसेल, तर कॉन्टेन्टमेन्ट बोर्ड महापालिकेत विलीन करा, असं मत मृताचे नातेवाईक अक्षय चाबुकस्वार यांनी व्यक्त केलं आहे. मात्र या प्रकरणात प्रशासनावर झालेले सगळे आरोप प्रशासनानेच फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात स्टाफची कुठल्याही प्रकारची चूक नाही. या संदर्भात राजकीय डावपेच करून हॉस्पिटला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र गलथान कारभार सुरु असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे.