पुणे : कबुतरांची अंडी खाणं पुण्यातील एकाच्या जिवावर बेतलं आहे. घरट्यामधील अंडी खाल्ल्याने बिथरलेल्या कबुतरांनी गोंधळ झाला. त्यांना हाकलण्यासाठी गेलेल्या या तरुणाचा इमारतीच्या आठव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. विमाननगरमधील ही घटना असून अर्णब मुखोपाध्याय असं मृत तरुणाचं नाव आहे.


अर्णब मुखोपाध्याय (वय 36 वर्ष) हा मूळचा पश्चिम बंगालचा होता. वोडाफोन कंपनीत कामाला असलेला अर्णब विमाननगर परिसरातील उच्चभ्रू गिनी बेनेला सोसायटीमधील इमारतीत पत्नीसह भाड्याने राहत होता.  18 डिसेंबरला रात्री कामावरुन परत आल्यानंतर दारुच्या नशेत अर्णबला ऑम्लेट खाण्याची इच्छा झाली. पण घरात अंडी नव्हती. त्यात बायकोनेही अंडी आणण्यास नकार दिला. मग अर्णबने किचनच्या गॅलरीतील कबुतरांच्या घरट्यातून आठ अंडी काढली आणि त्यांचं ऑम्लेट करुन खाल्लं.

मात्र घरट्यातून अंडी नेल्याने कबुतरांचा गोंधळ सुरु झाला. त्यांना हाकलण्यासाठी अर्णब त्यांच्या मागे चाकू घेऊन धावू लागला. इथेच घात झाला, कबुतरांना हाकलण्याच्या नादात तो बाल्कनीतून थेट खाली कोसळला आणि तिथेच गतप्राण झाला.

सुरुवातीला अर्णबच्या मृत्यूनंतर वावड्या उठल्या होत्या की त्याने आत्महत्या केली. कबुतराची अंडी खाल्ल्याने तो विक्षप्त वागत होता. त्याचं  मानसिक संतुलन बिघडलं होतं. पण पोलिस तपासात खरं कारण समोर आलं. आपल्या मुलाबाळांवर कुणी हल्ला केला तर माणसासह सर्वच प्राणी बिथरातात. अर्णबने तर कबुतरांच्या अंड्यातील पिल्लांचा जीव घेतला आणि तेच त्याच्या जीवावर बेतलं.