पुणे: पुण्यातील कचरा प्रश्नाला आता राजकीय वळण लागलं आहे. कारण मनसे पाठोपाठ आता शिवसेनेनेही कचरा फेकून आंदोलन केलं.


शिवसेनेने महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर कचरा टाकून आंदोलन केलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल महापौर मुक्ता टिळक यांच्या केसरी वाड्यातील घरासमोर कचरा टाकून आंदोलन केलं होतं.

दरम्यान शिवसेनेने आजच्या या आंदोलनात थाळी नाद आणि घंटानाद करण्यात आल्याने, पालिकेचा परिसर दणाणून गेला. दोन दिवसांमधे हा प्रश्न सुटला नाही तर महापौर आणि पालकमंत्र्यांच्या​ कार्यालयामध्ये कचरा टाकण्यात येईल असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

मनसेने महापौरांच्या घरासमोर कचरा फेकला

पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील ग्रामस्थ मागील 20 दिवसांपासून तेथील  कचरा  डेपोमध्ये  कचरा  टाकण्यास विरोध करित आहे. यावर महापौर,महापालिका आयुक्तांच्या समवेत बैठका निष्फळ ठरल्या. यात महापौर आणि पालकमंत्री परदेश दौऱ्यावर गेल्याने कचरा प्रश्न आधिक गंभीर झाला असून, या पार्श्वभूमीवर काल महापौर मुक्ता टिळक यांच्या घराबाहेर मनसेकडून कचरा टाकून आंदोलन केले.

पुणेकर जनतेला कचरा कोंडीमध्ये ठेवून महापौर परदेश दौयावर जातात. ही निषेधार्थ बाब असून प्रत्येकाच्या घरात कचरा साठला आहे .यामुळे आज महापौरांच्या घरासमोर कचरा फेकून निषेध व्यक्त केला. येत्या काळात प्रश्न न सुटल्यास महापालिका आयुक्तांच्या घरासमोरदेखील कचरा फेकू असा इशाराही मनसेने दिला.

राष्ट्रवादीचं आंदोलन

डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला सतत लागणाऱ्या आगीमुळे फुरसुंगीकरांचं जगणं मुश्कील झालं आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी या कचरा डेपोला जोरदार विरोध केला आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी फुरसुंगीला भेट दिली. याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हा परिसर कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त व्हावा अशी मागणी करत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कचऱ्याची प्रतिकात्मक अंतयात्राही काढण्यात आली.

‘या कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी याआधीच मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. तेव्हा ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु अद्याप त्यांनी आपला शब्द पाळला नाही.’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न?

पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.

इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो.

त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 19 दिवस केल्यास, 22 हजार टनांपेक्षा जास्त कचरा पुणे शहरात पडून आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातील कचराकोंडी 20 व्या दिवशीही कायम 

19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य

आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट

पुण्याचा ‘कचरा’, सांस्कृतिक राजधानीची ‘कोंडी’

ग्रामस्थांकडून फुरसुंगी कचरा डेपोची अंत्ययात्रा, तर मनसेचंही आंदोलन 

पुण्याच्या कचराप्रश्नी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यावं: सुप्रिया सुळे