पुणे : पुण्यातल्या सिंहगड कॅम्पसबाहेर किरकोळ वादातून गौरव जाधव या 20 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आशिष पवार आणि आकाश डोके या तरुणांना अटक केली आहे.


26 मार्च रोजी सिंहगड कॅम्पसबाहेर मित्राचा वाढदिवस साजरा करताना गौरव आणि इतर मित्रांमध्ये बाचाबाची झाली. त्यातील एकानं गौरवच्या डोक्यात बांबू मारुन त्याला जखमी केलं आणि पळून गेला.

गंभीर जखमी झालेल्या गौरवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत 24 तासाच्या आत आरोपींना अटक केली. गौरव मूळचा साताऱ्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळे गावचा असून सिंहगड कॉलेजमध्ये बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.

आरोपी आपल्या मूळ गावी पळून जाण्याचा तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या गुन्ह्यातील आरोपी आणि मयत हे सर्व सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असून वेगवेगळ्या पद्व्यांचे शिक्षण घेत आहेत.