Hingoli Agitation : हिंगोली ते मुंबई  रेल्वे सुरू (Hingoli to Mumbai railway service) करण्यासाठी हिंगोलीकर आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी आंदोलकांनी आज अमरावती-तिरुपती एक्सप्रेस (Tirupati–Amravati Express) रोखली आहे. आज रेल्वे संघर्ष समिती व्यापारी आणि पत्रकारांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं. सकाळी नऊ वाजता सर्व आंदोलक हे गांधी चौकामध्ये एकत्र आले होते. या ठिकाणहून मोर्चा काढत सर्व आंदोलक हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. सर्व आंदोलकांनी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जायचं असेल तर परभणी किंवा नांदेडहून  पुढील प्रवास रेल्वेने करावा लागतो. हिंगोलीहून मुंबईसाठी रेल्वे फेरी सुरू करावी म्हणून, गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे संघर्ष समिती व्यापारी त्याचबरोबर हिंगोलीकर हे प्रशासन दरबारी अर्ज विनंती करत आहेत. परंतू याची कोणतीही दखल प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही. त्यामुळं हिंगोलीकरांनी आज आक्रमक पवित्रा घेतला.


रावसाहेब दानवे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी


रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मराठवाड्याचे असताना सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नाही. त्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. या आंदोलनामध्ये विविध संघटना आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवला आहे.  आंदोलकांसोबत स्थानिक रेल्वे प्रशासनाने चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतू, आंदोलक आंदोलनावर ठाम होते. पोलिसांनी आंदोलकांना आडवण्याचा प्रयत्नही केला. परंतू आंदोलक थेट रेल्वे रुळावर पोहोचले. आंदोलकांनी रेल्वे रुळावरच आंदोलन सुरू केलं, याच कालावधीमध्ये अमरावती-तिरुपती एक्सप्रेस हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनवर दाखल होत होती. या रेल्वेला आंदोलकांनी रोखले. यावेळी काही आंदोलक रेल्वेच्या इंजिनवर देखील चढल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी केंद्रीय रेल्वेमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 


आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग 


आजच्या या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींचा सहभाग दिसून आला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यासह अनेक सामाजिक संघटना व्यापारी त्याचबरोबर वकील आणि पत्रकारांचा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग होता. हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करा यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 



काय आहेत मागण्या?
 
जालना-छपरा एक्सप्रेस ही पुर्णा-हिंगोली-अकोला मार्गे चालवावी


वाशिम, हिंगोली, वसमतमार्गे मुंबईसाठी रेल्वे सुरु करावी


हिंगोली स्टेशनवर गुड्स शेड उभारावे


वसमत स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील माल धक्का बंद करावा 


हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू झाल्यानंतर काय होणार फायदा ? 


हिंगोलीवरुन  मुंबईला जाणारी कोणतीही रेल्वे नाही. त्यामुळं कार्यालयीन कामकाजानिमित्त मुंबई जाणाऱ्या नागरिकांना आणि व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. जर ही रेल्वे फेरी सुरू झाली तर कार्यालयीन कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना त्याचबरोबर व्यवसायासाठी दळणवळणाला साईस्कर होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील व्यवसायाला सुद्धा यामुळं चालना मिळणार आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी हिंगोलीकरांचा थेट संपर्क राहण्यास मदत होणार आहे.