नांदेड: मराठवाड्यातील पाणी टंचाई किती भीषण आहे, हे पुन्हा एका समोर आलं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीच्या ग्रामस्थांनी स्मशानात आमरण उपोषण सुरू केलं आहे. ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.


 

सुमारे 12 हजार लोकवस्तीच्या या गावाला सध्या पाणी टंचाईचा समान करावा लागत आहे. या गावाजवळ लिंबोती धरण आहे. या धरणातून नांदेडसह लातूर जिल्हात अनेक ठिकाणी पाणी नेण्यात आलं आहे. पण या धरणातून पाईपलाईन टाकून माळाकोळीला मात्र पाणी देण्यात आलं नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील ग्रामस्थांची झाली आहे.



याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडं वारंवार पाठपुरावा केला. मात्र काहिही उपयोग झाला नाही. त्यामुळं अखेर स्मशानात चिता रचून ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबवला आहे. सरकारनं ठोस कृती न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 

माळाकोळी हे गाव शिल्पकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. देशातील विविध भागात इथले कलाकार दगडातून देव साकारतात. दगडाला देवत्त्व देतात. पण गावालगत धारण असूनही ग्रामस्थांना पाणी मिळत नाही आहे. निवेदने झाली, किरकोळ आंदोलने झाली, तरीही सरकारला जाग येत नाही. त्यामुळेच आता एक तर सरकारने माळाकोळीला पाण्यासाठी ठोस कृती करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या अंत्यविधीस यावे असा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.