अहमदनगर : शनी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी चौथऱ्यावर प्रवेश करुन शनीदेवाचं दर्शन घेतलं. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर समितीने महिलांना दर्शन खुलं केलं. त्यानंतर भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या पुष्पक केवडकर आणि प्रियांका जगताप यांनी थेट शनी चौथरा गाठला आणि शनीदेवाला पुष्पहार अर्पण करुन तेल वाहिलं.
महत्त्वाचं म्हणजे यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलिसही तिथे हजर होते. मात्र कोणीही महिलांना चौथऱ्यावर जाण्यास विरोध केला नाही. चौथऱ्यावरुन खाली आल्यानंतर भाविक महिलांनी पुष्पक आणि प्रियांका यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान, मंदिर समितीने सकाळी चौथरा दर्शनासाठी खुला केल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई पुण्याहून शनी शिंगणापूरकडे निघाल्या आहेत. मात्र त्याआधीच पुष्पक केवडर आणि प्रियांका जगताप यांनी शेकडो वर्षांच्या रुढी, परंपरेला मूठमाती दिली.
नारीशक्तीचा विजय प्रवेश करताना कोणीही अडवलं नाही. दर्शनामुळे अतिशय आनंद झाला. नारीशक्तीचा आज विजय झाला, अशी प्रतिक्रिया पुष्पक केवडकर यांनी दर्शनानंतर दिली.
काय होता शनी शिंगणापूर वाद? शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. मात्र 28 नोव्हेंबर 2015 रोजी एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनीवर अभिषेक केला होता. महिलेने 400 वर्षांची परंपरा मोडित काढत शनिदेवाला अभिषेक केला. या घटनेनंतर 7 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं. महिला भक्ताने शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन त्याचं दर्शन घेत तेलाचा अभिषेक केल्याचं प्रकरण उघडकीस येताच शिंगणापूरसह राज्यभरात चांगलाच गदारोळ माजला. मात्र, तिने शनिदेवाचं दर्शन घेणं ही एका क्रांतीची नांदी असल्याचं सांगत सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. दुसरीकडे महिलेने थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यामुळे ग्रामस्थांनी निषेध सभा घेतल्या. इतकंच नाही तर शनीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करुन शुद्धी करण्याचाही घाट घातला.