Presidential Polls:  जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील 22 विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. याबाबत बोलताना केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार 100 टक्के निवड येणार असल्याचा दावा केलाय. ममतादीदींना कितीही प्रयत्न करू दे, भाजपला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एक टक्के मतांची आवश्यकता आहे. मोदींजीच्या  नेतृत्वाखाली भाजप कुठूनही कोणालाही कन्व्हेन्स करू शकते, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.  कल्याण डोंबिवली मधील निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन या पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयावर संवाद साधला. 


संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार -
राऊत यांना निवडणूक स्ट्रेटेजी व निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे की नाही याबाबत विचार करण्याची गरज आहे, असा टोला यावेळी कपिल यांनी लगावला. राज्यसभा निवडणूक निकलानंतर संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना आमच्या हातात ईडी असती तर आम्हाला ही मतं मिळाली असती, असं वक्तव्य केलं होतं. याबाबत बोलताना केंद्रीय मत्री पाटील यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. केंद्रीय मंत्री पाटील यांनी संजय राऊत यांना ईडीमुळे मते मिळाली का? , राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला विजय हा देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रेटेजीचा विजय आहे. राऊत यांना निवडणूक स्ट्रेटेजी आणि निवडणुक लढवण्याचा अनुभव आहे की नाही? याचा विचार करण्याची गरज आहे , स्वतःचा पराभव कुणाच्यातरी पाठीमागे लपवण्याचे काम करण्याची त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. अशाप्रकारे काही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवणार , यामध्ये ईडी चा प्रश्न आला कुठून? त्यांच्या दोन आमदारांना हायकोर्टाने सुद्धा मतदानाचा हक्क नाकारला, हायकोर्ट सुद्धा ईडीच्या सांगण्यावरून चालतं का ? असा सवाल पाटील यांनी केला. पुढे बोलताना पाटील यांनी मध्यंतरी राऊत यांनी न्यायालय भाजपच्या माणसांना जामीन देते, आम्हाला नाकारत, असं वक्तव्य केलं होतं. यावरही पाटील परखड मत व्यक्त केले. , त्यांना आता सवय झाली आहे, काही नाही झालं की ते केंद्र सरकार आणि भाजपावर बोट दाखवतात, यापलीकडे ते  काही भाष्य करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.


वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे भाजपला फायदा होणार - 
राज्यसभा निवडणूक निकालानंतर महविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करू, असं वक्तव्य केलं होतं. याबाबत बोलताना केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणारे मंत्री आहेत. ते विधानपरिषदेत भाजपचे पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सहाय्य करणार असा याचा अर्थ आहे. राज्यसभा निवडणुकीत जी काही मतं भाजपच्या पारड्यात पडली, ती महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या आमदरांची होती. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर आणखी आमदार आमच्या बाजूने येत मतदान करतील, अपक्ष आमदारावर दबाव आणण्याचं काम आघाडी सरकारचं सुरू आहे, देशात लोकशाही आहे. राज्यात लोकशाही आहे की नाही? याबाबत विचार करावा लागेल, असा टोला पाटील यांनी लगावला.