मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. 'एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत' अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.


सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही - गृहराज्यमंत्री देसाई
प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केलेल्या टिकेसंदर्भात बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही टीका निंदनीय असल्याचे आणि अशा प्रकारची टीका कदापि सहन करणार नसल्याचे सांगितले आहे. दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. मराठा समाज शासनाकडे आरक्षणासाठी पाठपुरावा करत आहोत. सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनता ही टीका सहन करणार नाही, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.


मराठा आरक्षण समितीकडून निषेध


मराठा आरक्षणाच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत आहे. पण 'एक राजा बिनडोक' या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील सर्व नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असून मराठा आरक्षण, एमपीएससी परीक्षा, पोलीस भरती, नोकर भरती यासह विविध विषयांवर महत्त्वाचे मुद्दे मांडणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितलं.

साताऱ्यात प्रकाश आंबेडकरांविरुद्ध घोषणाबाजी


प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर साताऱ्यातील कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. साताऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत उदयनराजे जिंदाबाद, प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील केली.


प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर परळीमध्ये सुरू असलेल्या मराठा रोख ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला आहे. प्रकाश आंबेडकरांनी छत्रपतींच्या वारासदारांवर टीका करू नये असे आवाहन केलं आहे.


'एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर', प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका


प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'एक राजा बिनडोक'


पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला आहे.


आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देतायत. ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


ते म्हणाले की, मराठा समाजाने महाराष्ट्राला आतापर्यंत खुप चांगले नेतृत्व दिले आहे.  ते नेतृत्त्व सगळ्यांचा विचार करणारे होते.  आता जे नेतृत्व करत असल्याचं दाखवतायत ते खुजे आहेत. स्वतःच आस्तित्व टिकवण्यासाठी जातीचा आधार घेत आहेत, असं आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर  म्हणाले की, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी फोन करुन 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली.  त्यानुसार 10 तारखेच्या बंदला आमचा पाठिंबा असेल.  हा पाठिंबा देताना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण वेगळं आहे हे समजताच तो आम्ही त्यांना सांगितले आहे आणि ओ बी सी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आम्ही सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वातावरण बिघडताना दिसतेय.  वेगवेगळ्या मराठा संघटना आक्रमक होताना दिसतेय. त्यांच्यात कलह होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रील वातावरण बिघडू  नये यासाठी आम्ही 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आरक्षण कोणाला द्यायचं याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला आहे, असंही आंबेडकर म्हणाले. एमपीएससीच्या परीक्षेला विरोध करणारे मराठा नेते मराठा आरक्षणाच्या पायावर धोंडा पाडून घेतायत. एमपीएससीची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. एमपीएससीची परीक्षा हा सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, असं आंबेडकर म्हणाले.


VIDEO | नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर



संबंधित बातम्या


एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार : खासदार संभाजीराजे


नवी मुंबईतील मराठा समाजाच्या बैठकीला उदयनराजेंची पाठ, साताऱ्यात राज्यव्यापी मेळावा घेणार


MPSC Exam | एमपीएससी परीक्षेवरुन मराठा विद्यार्थी, संघटनांमध्ये मतमतांतर