पंढरपूर : लोकसभा निवडणुकीत सध्या मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार असून यंदा निकाल वेगळे लागतील असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वारंवार दुष्काळाशी सामना कराव्या लागणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पाणी पळविणाऱ्या बड्या ठेकेदारांना विधानसभेत पराभूत केल्यास दुष्काळाचा प्रश्न सुटेल असाही टोला आंबेडकर यांनी लगावला.


सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर आज प्रकाश आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्यासाठी आले होते. महाराष्ट्रात अलीकडे सातत्याने दुष्काळ पडत असल्याने कायमस्वरूपी दुष्काळी उपाययोजनेची तयारी शासनाने करून ठेवणे आवश्यक असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात काही मंडळी सातत्याने पाणी पळवित असल्याने इतर जनतेच्या माथी हा दुष्काळ येत आहे. यामुळे या नेत्यांना निवडणुकीत हरवून तुमचा दुष्काळ हटवा, असे त्यांनी सांगितले. ब्रिटिशांनी कोकणातील नद्यांची तोंडे पश्चिम महाराष्ट्राकडे वळविल्याने येथे पाण्याचा उपलब्धता मोठी असली तरी नियोजनाच्या अभावामुळे सातत्याने दुष्काळाचे संकट येत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

निवडणुकीनंतर काही कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला पंढरपूर येथील जनकल्याण हॉस्पिटल मध्ये जाऊन आंबेडकर यांनी माऊली हळणवर या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी आपल्या दुष्काळी दौऱ्याची सुरुवात सांगोला तालुक्यातील मांजरी येथून करीत चारा छावण्यात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

येथूनच आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावून छावण्यांचे अनुदान आणि इतर दुष्काळी प्रश्नाबाबत चर्चा केली. चारा छावणीत असलेल्या शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून मजुरी देण्याची मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली. आज आंबेडकरांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला.