अकोला : 'लॉकडाऊन' वाढविण्याला वंचित बहुजन आघाडीनं तीव्र विरोध केला आहे. वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील लॉकडाऊन हटविण्याचं आवाहन केलं आहे. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी लॉकडाउन हटविणे राज्यासाठी हितावह असल्याचं आंबेडकर म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना मृत्यूदर कमी करण्याच्या केलेल्या दाव्यावर आंबेडकरांनी तिरकस टिका केली आहे. मुख्यमंत्र्यांना टोला लगावतांना आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना असे दावे करून स्वत: 'खुदा' (देव) बनू नका, असं सुनावलं आहे.


आंबेडकरांनी आता कोरोनाची भिती न बाळगण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. यासाठी त्यांनी यासंदर्भात भारतातील कोरोनासंदर्भात ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा दाखला दिला आहे. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील, अशी भिती आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन वाढवू नका, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


भारतात 40 टक्के नागरिक कोरोनाने बाधित होतील असे अमेरिकेच्या 'हाफकीन संस्थे'ने सांगितले होते. पण एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात कोरोना पसरणार नाही. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरले असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.


आंबेडकरांनी यासंदर्भात सरकारला केलेल्या आवाहनात भगवान गौतम बुद्धांच्या वचनाचाही दाखला दिला आहे. ते म्हणाले की, बुद्धांनी एक सत्य वचन सांगितले आहे की, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे. आंबेडकरांनी सरकारला विनंती करतांना म्हटले की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे. तरच माणसं जगतील अन्यथा उपासमारीने मरतील अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन राज्यात वाढवु नका, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला केलं आहे.