सत्ता गेल्यावर मुख्यमंत्री भीमा-कोरेगाव प्रकरणी सह आरोपी : प्रकाश आंबेडकर
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 09 Jul 2018 07:23 PM (IST)
भिडेंच्या माध्यमातून सरकार दंगली घडवून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
औरंगाबाद : भिडे गुरुजींचं वक्तव्य एकप्रकारे सरकारकडून संरक्षण दिल्यासारखं आहे. भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी सत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील सह आरोपी होतील, असं वक्तव्य भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. भिडेंच्या माध्यमातून सरकार दंगली घडवून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. संत आणि वैदिक परंपरा या वेगळ्या असून भाजप भिडेंच्या माध्यमातून आपल्यावर वैदिक परंपरा लादत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. औरंगाबाद दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकांसाठी आम्ही काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला असल्याचं प्रकास आंबेडकर म्हणाले. लोकसभेसाठी 12 जागा देण्यात याव्या, अशी मागणी आपण काँग्रेसकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस हा पक्ष म्हणून राहिला नसून त्यावर एकाच कुटुंबाचा ताबा आहे. केंद्रीय स्तरावर भाजप विरोधात महाआघाडी अस्तित्वात येईल, असं वाटत नसल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.