भंडारा : उमेदवार कुणीही असो, एकमेकांना मदत करु, असं म्हणत भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी लोकसभा पोटनिवडणुकीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. प्रफुल्ल पटेल आपल्याला भावासारखे आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले  काय म्हणाले?

“भंडारा गोंदियातील प्रफुल्ल पटेल आणि माझ्यातील वाद संपलेला आहे. भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यावर एकमत झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊन ही निवडणूक लढेल. वरिष्ठ येत्या दोन दिवसात निर्णय घेतील. जो निर्णय देतील तो दोघांनाही मान्य असेल.”, अशी भूमिका नाना पटोले यांनी जाहीर केली.

तसेच, “प्रफुल्ल पटेल माझ्या मोठ्या भावासारखे आहे. वैचारिक व्यवस्थेमुळे आमचे भांडण होते. आता आम्ही दोघांनाही निर्णय केलाय की, जनतेचं ऋण फेडायचं आहे. दिल्लीत त्यांच्या घरी पटेलांशीही चर्चा केली.”, असेही पटोले म्हणाले.

काल पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत शरद पवार यांनी पोटनिवडणुकीच्या दोन जागांपैकी एक-एक जागा लढण्यासाठी मित्रपक्षांना विनंती करणार असल्याचं पवार म्हणाले होते. तसंच आम्ही जिंकलेल्या जागा आम्हीच लढवणार अशी भूमिकाही पवार यांनी घेतली. त्यामुळे अप्रत्यक्षपणे भंडारा-गोंदियाची जागेवर राष्ट्रवादीने हक्क सांगितल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि आज नाना पटोले यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO : नाना पटोले काय म्हणाले?