मुंबई : पीएमसी (पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक) बँकेचे सर्व व्यवहार 24 सप्टेंबर सकाळपासून बंद झाल्यानंतर आता पीएमसी बँक ठेवीदारांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. आता पीएमसी बँकेतील ठेवीदार आपल्या खात्यातून दहा हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकणार आहेत.  रिर्जव बँकेने 35A अंतर्गत पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश मंगळवारी दिले होत, त्यानंतर ठेवीदार (ग्राहक) महिन्याला आपल्या खात्यातील फक्त एक हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतील असे सांगितले होते.


त्यामुळे रिझर्व बँकेने आज नव्याने दिलेल्या आदेशानुसार आता हे ठेवीदार (ग्राहक) सहा महिन्यातून एकदा 10 हजार रुपयापर्यंत पैसे काढू शकणार आहे.

बँक डबघाईला आल्यामुळे पीएमसी बँकेचे पुढील  व्यवहार आरबीआयकडून मंगळवारी 24 सप्टेंबरपासून  बंद करण्यात आले होते. हे व्यवहार सुरु ठेवण्यास आरबीआयकडून पुढील परवानगी नाकारली आहे.

यामध्ये ठेवीदार महिन्याला फक्त एक हजारापर्यंतच आपल्या ठेवी काढू शकत असल्याने मंगळवार सकाळपासून पीएमसी बँकेचे व्यवहार बंद झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पीएमसी बँकांमध्ये ग्राहकांचा गोंधळ पाहायला मिळत आहे.

या प्रकरणात पुढील सहा महिन्यात योग्य तो मार्ग काढणार असल्याचा पीएमसी बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शिवाय ग्राहकांनी याबाबत काळजी करू नये असंही पीएमसी बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

बँकेचा एनपीए वाढणे, बँकेची गुंतवणूक धोक्यात येणे, वाढती बुडीत कर्ज ही पीएमसी बँक संकटात येण्याची मुख्य कारणं असल्याची, बँकिंग तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

अशावेळी, रिझर्व बँक राज्य शासनाच्या परवानगीने एक प्रशासक सहा महिन्यासाठी नेमते आणि या बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. आर्थिक संकटातून बँक सहा महिन्यातून बाहेर आली नाही तर पुन्हा वाढीव तीन महिन्याची मुदत बँकेला दिली जाते.

मात्र असं असलं तरी तोपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा महिन्यासा 10 हजार रुपयांपर्यंत वाढविल्यामुळे काहीसा दिलासा नक्कीच पीएमसी बँक ग्राहकांना मिळणार आहे.