मुंबई : प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलण्याचा तयारीत आहे. निवासी हॉटेल्समध्ये प्लास्टिक पॅकेज्ड बॉटल्सवर म्हणजे बाटलीबंद पाण्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.


बंदीनंतरही दुकानात प्लास्टिकच्या कॅरीबॅग्स (पिशवी) आढळल्यास दुकानांचे लायसन्स रद्द करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना बहाल करण्यात येणार आहेत. म्हणजेच महापालिका, नगरपालिका यांच्याकडून संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल.

निवासी हॉटेल्समध्ये राहणारे ग्राहक अनेक वेळा बाटलीबंद पाणी विकत घेण्यावर भर देतात. हॉटेलमध्ये शुद्ध पाणी मिळेलच, याची खात्री नसल्यामुळे अनेक जण हा पर्याय निवडतात. मात्र बाटलीबंद पाण्यावर बंदी आल्यास ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

याबाबत चर्चेसाठी पर्यावरण विभागाने पॅकेज्ड बॉटल्स मॅन्युफॅक्चरर्स, दुकान मालक असोसिएशन, हॉटेल मालक संघटनांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे.